India US agreement | भारत-अमेरिका द्विपक्षीय करारावर लवकरच स्वाक्षरी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय सामरिक भागीदारीतील सातत्य कायम ठेवण्यावर भर दिला आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा रविवारी पार पडली. व्यापार चर्चा आणि अमेरिकेच्या कडक व्हिसा धोरणांबाबतच्या चिंता व्यक्त होत असताना झालेल्या या चर्चेला महत्त्व दिले जात आहे.

चर्चेनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य केले. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील संबंधांच्या केंद्रस्थानी नागरिक आणि त्यांचे परस्पर संबंध आहेत. अवैध स्थलांतराला आळा घालताना कायदेशीर प्रवाशांना, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना व्हिसा मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर व्हायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर रुबिओ यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेचे नवे कडक व्हिसा आणि इमिग्रेशन धोरण केवळ भारताला लक्ष्य करण्यासाठी नसून ते जागतिक स्तरावर लागू आहे.

व्यापार करार अंतिम टप्प्यात

व्यापार कराराबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक माहिती दिली. जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमधील परस्पर फायदेशीर व्यापार कराराच्या अंतिम मसुद्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. रुबिओ यांनीही याला दुजोरा देताना सांगितले की, दोन्ही देश एका शाश्वत व्यापार कराराच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आक्रमक जागतिक व्यापार धोरण भारताच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा सुरक्षा आणि प्रादेशिक शांतता

मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि जागतिक खनिज तेलाच्या किमती यावरही सविस्तर चर्चा झाली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेला परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देणे हे भारत सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जयशंकर यांनी अधोरेखित केले. तत्पूर्वी रुबिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

1) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक.

2) व्यापार कराराबाबत दोन्ही देशांमध्ये लक्षणीय प्रगती, लवकरच अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता.

3) जयशंकर यांनी कायदेशीर भारतीय प्रवाशांना अमेरिकन व्हिसा मिळण्यात येणार्‍या अडचणींचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला.

4) ऊर्जा सुरक्षा आणि मध्य पूर्वेतील शांततेवर भारताचा भर; रुबिओ यांच्याकडून भारताचा इंडो पॅसिफिकचा आधारस्तंभ असा गौरव.



from pudharinews https://ift.tt/G1Mnmut
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url